कधी बुबुळातून गळून पडेल याचा नेम नाही
पापणीचा देठ सुकून चाललाय
नजरेच्या पारंबीला धरून झुलता येणार नाही कुणालाच
ऊन गळून पडले तर अंधाराला रान मोकळे होईल
काळोख गिळून टाकेल शरीराचे झाड मातीसकट
ऊन जपायला हवे चटका बसला तरिही
ऊन टिकवायला हवे त्वचेच्या आत धग म्हणून
तळवे गरम होईल
कुशीत ऊब जन्माला येईल
हिरवी माया ओंजळीत घेईल...ऊन हवेच हवे...
कोणती काळजे कुरतडत असेल ऊन्हाला?
की दूरवर दूसरा प्रकाश उगवतो आहे
ह्याची भीती वाटते त्याला?
आपण जुने झालोत बुरशी आलीये किरणांना
आणि वास येतोय पुर्वेकडून
असे तर वाटत नाही
ऊन्हाच्या तळहातावरले जीवनसत्व नष्ट होते आहे
त्यानी गोंजारले तरी बरे होत नाहीत कातडीवरले डाग
वा रक्त वाहत नाही स्पर्शसुखाने आपसुक
ऊन अगतिक झाले आहे पराभवच्या धाकाने
आणि असहाय चैतन्यहीन चाहूलीने
ऊन आता पिवळसर डोळे किलकिले करून
आभाळाकडे आशेने पहाते नव्या सूर्याचा उदय होईल असे वाटते
ऊन्हाला आता आपलीही सावली असावी असे वाटते ते सावलीला टेकून
उभे रहाते आणि सावलीचे बोट धरून अस्ताचलाकडे सरकत जाते...
सरकत रहाते...
(काळोखाच्या वर प्रकाशाच्या खाली)
No comments:
Post a Comment