मी भणंग झालो तुझिया स्पर्शातून फिरता फिरता
लावतो लग्न कवितांचे अक्षरे उधळूनी आता
गे तुझा स्पर्श होताना गुलमोहोर हिरवा होतो,
मी सूर्य तांबडा झालो रक्तिमा प्राशूनी घेता
बांधले सदन गगनाचे, लाविल्या छ्तावर तारा,
अन अंगण झाले अपुरे पृथ्वीवर येता येता
आगीवर जाळीत गेलो षड:रिपूस औदार्याने,
शत्रूस म्हणालो ’स्वामी’ राखेतून उरता उरता
नात्यात अडकलो तेव्हा मी कुणाकुणाचा होतो?
बेछूट बहकलो आणि विश्वाचा झालो त्राता
मी देह सोडीला तेव्हा ते मडके फोडीत होते,
मी हसलो भस्मांगाने ज्वाळात लपेटून घेता
वाद्यात कोंबले त्यांनी ते राग, सूर समयांचे
हातावर तेव्हा माझ्या कोवळा षड्जही होता
येवोत कितीक लुटारू कातडी सोलण्यासाठी
बघ जगण्याचा कारंजा जखमेतून उसळत होता
अभ्रातून लुकलुकणारा कोवळ्या दवांत कसाही
उगवला दीस सृजनाचा ओठातून गाता गाता
अद्वैत उसासा होतो दोघांचा दोघांदाठी
कायेचा कापूर झाला चैतन्यस्पर्श तू करता