Tuesday, January 1, 2013

रूबाई


१) कुणी म्हणती जगणे आहे सुंदर कविता
कुणी म्हणते खडतर बडतर्फीचा खलिता
रे जगणे म्हणजे धनादेश हा कोरा
अन शाई संपते स्वाक्षरी करता करता

२) हे मित्र मैत्रिणी लबाड सारे खोट्टे
ह्या कविता गाणी रद्दी भंपक मोठ्ठे
पण संध्याकाळी काय होतसे आत
मन स्वैर धावते पुन्हा शोधण्या कट्टे

३) जो फुलात वसतो तोच सुगंधी असतो
जो खळाळ हसतो जिवंत तेव्हा असतो
जो क्षमस्व म्हणतो, क्षमा विसरूनी करतो
तो माणूस म्हणूनी अस्सल उठुनी दिसतो

४) पाठीवर नव्हता चंद्र चांदणी नव्हती
पोटात जळे अवसेची भोवळ भवती
तारांगण नुसते खुळखुळ वाजत होते
एकही पौर्णिमा मनात उगवत नव्हती

५) बखरीत अडकला प्राण म्हणाले राजे
वाळवी लागली स्मृतीस झटका राजे
तलवार नव्हे तर इथे गंजले मेंदू
मज श्वास एकदा मुक्त घेऊद्या राजे

(मी मॄगजळ पेरीत...)

No comments:

Post a Comment