Sunday, February 17, 2013

मनाच्या


मनाच्या डोहात
टाकला मी खडा
एकही शिंतोडा       उडेचिना---

मनावर कोणी
कोरली पापणी
तरी कसे पाणी     वाहेचिना---

मनावर अशी
दाटू लागे साय
तरी कशी माय     दिसेचिना---

आता कळो आले
आटलासे डोह
तरंगांचे मोह        खुळ्यालागी---

(पालव)

चांदण्या


डोळे गच्च मिटले की
आभाळाही डोळ्यात दाटून येतं म्हणे!
मला ते ठावूक नाही
माझ्या पापण्यांच्या केसात
चांदण्या कधीच्याच बसल्यात दडून.

(पालव)

प्रवास



तुरुतुरु धावणार्‍या मुंगीला विचारले
तुझा प्रवास कोठून कोठे
?
तिच्या कुजबुजण्याचा अर्थ कानांना समजत नाही
की माझ्या शब्दकोषात
पाचव्या युगाचे नावच नाही
?

(पालव)

होवो


तिला प्रथमच शिवलेला कावळा
पळत येऊन माझ्या कानात म्हणाला
तिला बंदिवान करून आलोय पुरता
तुझा प्रवास सुखाचा होवो!

(पालव)

Saturday, February 2, 2013

कुसुमाग्रज: काही स्पंदने

१.
लोकप्रियतेच्या शेपट्या लावून
भुभु:कार करणार्‍या कवड्यांच्या वराती
दारासमोरून जाताना
सारे शहर उत्सवाच्या दंगलीत उधाणत रहाते
शब्दांचा आतिषबाजीत अवघा लौकीक
उजळून निघताना मी एकाकी होत जातो
एकटा एकटा दूर आभाळाखाली
सताड...नग्न...उभा रहातो
माझे हात चांदण्यांचे...आणि
खांद्यावर निळा पक्षी थोपटणारा!

२.
आमच्या बापजाद्यांनी गायलेल्या
तुमच्या क्रांतीगीतांनी त्यांच्या निधड्या छातीवर
पदवी कोरली
आणि त्यांची विद्यापीठे झाली
कुलगुरूंच्या नेमणुकीशिवाय
कुलपतींच्या आदेशाविना
आज... मी प्रवेशद्वारावर उभा
माझ्या हातात पदव्यांच्या छापखान्यातून
बाहेर पडलेला एक कोरा कागद
आणि निधडी छाती? .... हो
डोनेशनच्या दम्याने पोखरून निघालेली
आणि ओठांवर क्रांतीगीत
बेकारीच्या भवितव्याचे
मला त्या विद्यापीठात प्रवेश हवाय

३.
मध्यरात्री तुळशीवृंदावनापाशी
आभाळमातीचे संदर्भ त्पासून पहाताना
पणतीवर कुठलीतरी फुंकर घातली
आणि पदरात काळोख फेकून
संस्कृतिचे विश्वस्त चालते झाले
तेव्हा तुम्ही... (शांतपणे)
कोलंबसाचे वादळ समुद्रात उगाळून
क्षितीजावर उष:काल लिहीला...

४.
पृथ्वीच्या हट्टासाठी प्रेम्गीत गावे
तर माणसे बेघर होतात
बासरीच्या सप्तकातून कृष्णाला मोकळा करून
कुब्जेला बहाल करावा
तर वस्त्यांना आगी लावल्या जातात
मोर्चा घेरावाचा गदारोळात
मी बावरून उभा
कुठलाच प्रदेश माझा नाही
कोणतीच भाषा माझी नाही
तुम्ही समिधा दिली खरी
पण यज्ञ कुठे करू?
मला बोट धरून माणसांची वस्ती दाखवाल?

५.
संज्ञेच्या सामर्थ्यावर शब्द जगतो
पण माणसांचा मागमूसही नसलेल्या
अरण्यात झाडांना पाणी कोण घालतो?
आणि फुलेही कोण खुडतो?
मला तो शब्दांचा किरण द्या
जो अभेद्य खडक फोडून
पाताळातल्या शेषाचे वीष नष्ट करेल
आणि आभाळाची अदृश्य पोकळी छेदून
नक्षत्रे ओंजळ भरून माणसांना वाटून देइल
तुमच्या अथांग डोळ्यात आकाशगंगा
गहिवरतांना मला दिसलीय...

(आभाळाचा अनुस्वार)



मर्ढेकर : एक संवाद



गोड हिवाळा पिणारे तुमचे चार शब्द
आज माझ्या ओंजळीत आहेत
आणि बोटांच्या फटीतून झिरपणारा आशय
मी तुमच्या स्वाधीन करीत आहे
मर्ढेकर,
आताशा उंदीर पिपात मरत नाहीत
ते फ्लॅटच्या बिळांमधून आत्मदहन करतात
परंपरा आणि नवतेचा सांगड घालतात
’सह नौ टरक्तु’ चा उदघोष करणारी मुंगी
स्वत:च्या वारूळात बसून समग्र क्रांतीवर
चार शब्द बोलतो... तेव्हा...
लोकलच्या वेळापत्रकाने गुदमरून गेलेला फलाटदादा
विडीचे दोन झुरके घेतो
आणि सौंदर्यमीमांसा धूर सोडतो
तेव्हा अवघी मराठी समीक्षा घुसमटून जाते...
मर्ढेकर,
आता एवढेच करा
कवितेच्या ओळीला ह्यांच्यापासून मुक्त करा
आणि तुमचे स्मारक होण्यापूर्वीच
गणपत वाण्याला सांगून
ह्यंचा हिशेब चुकता करा
पण जरा जपून...
कारण नवकवितेच्या काळजी वाहणारे चार सर्कारी कवी
तुमचा पुतळा उभारण्याच्या विचारत आहेत,
आणि त्याच त्याच पुतळ्यावर बसून कंटाळलेले कावळे
आणि पुतळ्यांना हर घालण्यासाठी हात शिवशिवत असलेले
मंत्री
नवकवितेच्या स्मारकाचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक आहेत
म्हणून म्हणतो.... मर्ढेकर....
आमचे बोट धरून पौर्णिमेच्य डोहात आम्हाला घेऊन चला
कितीतरी दिवसात आम्हीही चांदण्यात न्हालोच नाहीत...
मर्ढेकर...
हेही चांगलेच झाले
तुमच्या नावाचे कुंकू आमच्या कपाळाले लागले
कारण तुकारमानंतर तुम्ही
आणि तुमच्यानंतर आम्हीच.... म्हणनारे इथे येऊन गेले
..... चार दिवस राहून गेले.....
आज त्यांचाच वस्तीतून जाताना
आम्ही कुंकू मिरवीत जाऊ
मर्ढेकर,
तुमच्यासोबत कवितेचा नवा चंद्र पाहू....

(आभाळाचा अनुस्वार)

ओळ



तुझ्या ओळींवरून घसरताना काना भिंती उभारतात
वेलांटी छप्पर धरते, मात्रेमधून प्रकाशझोत झिरपतो
उकाराची उभार छाती रूकाराने झाकून स्तनाग्रांच्या अनुस्वाराने अर्थगर्भीत
ओळीच्या घरावर विसर्गाचे तोरण विरामचिन्हांची फुले अंगणभर

तुझ्या ओळीवर पसरताना अक्षराअक्षरात अडकतो श्वास
घट्ट मिठीत गुदमरून आवेगाने फडफडत रहावे सर्वांगाने तसा
विस्तारते आशयाचे अवगुंठन प्रदीर्घ चुंबनाच्या विलंबीत लयीत

तुझ्या ओळीत विसरताना स्व:तालाच शोधतो, थांबतो पूर्णविरामापाशी
मागे वळून पहातो गालाचे वाळवंट होताना
ओठांची पखाल घट्ट पकडून
पानोन पान करतो प्रवास न थकता

तुझ्या ओळीत सरताना विरघळतो पूड होऊन, उगाळत रहातो देह
कातडीची सहाण तुझ्या हातांच्या खोडाने घासताना गंध फुटेपर्यंत
उधळातो गच्च भीजगंध अक्षरांना फुटलेला

ओळ सरली तरी पसरत गेलेलो दोघं मैलोन मैल
दिवसेंदिवस... ’कवितोकविती’...

(कविता रती दिवाळी २०१२)